नेपाळ मध्ये आलेल्या पुराच्या चिखलामध्ये अडकलेल्या पन्नास कोटी पेक्षा अधिकची संपत्ती पोलिसांनी सुरक्षितपणे बाहेर काढली आहे.
नेपाळ मध्ये चालले तब्बल आठ तास ऑपरेशन
काठमांडू : नेपाळमध्ये भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण महापुरामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार उडाला आहे.
या पुराचा फटका नुवाकोट जिल्ह्यातील त्रिशूली परिसरातील कृषी विकास बँकेच्या त्रिशूली-ढुंगे शाखेलाही बसला.
पुराचे पाणी बँकेच्या शाखेत शिरल्याने संपूर्ण इमारत पाण्यात बुडाली होती.
मात्र, पाच दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी बँकेतील कोट्यवधी रुपयांची संपत्ती सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवले.
पुराचे पाणी ओसरल्यानंतर बँकेच्या शाखेत मोठ्या प्रमाणात गाळ, माती आणि चिखल साचला होता. त्यामुळे बँकेच्या लॉकरपर्यंत पोहोचणे पोलिस आणि बचाव पथकासाठी मोठे आव्हान ठरले.
तब्बल आठ तास चाललेल्या बचाव मोहिमेनंतर गाळाचा मोठा भाग हटवण्यात आला. त्यानंतर बँकेत अडकलेले मौल्यवान साहित्य सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
रोकड, सोने, चांदी मौल्यवान वस्तू सुरक्षित
नेपाळ पोलिसांच्या माहितीनुसार, या कारवाईत सुमारे ५० कोटी नेपाळी रुपयांचे सोने, सुमारे दीड कोटी नेपाळी रुपयांची रोकड, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित करण्यात आल्या आहेत.
याशिवाय बँकेतील महत्त्वाची कागदपत्रे आणि दस्तऐवजही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहेत. गाळात अडकलेल्या खोके आणि लॉकरमधून ही संपत्ती बाहेर काढण्यात आली.
भोटेकोशी नदीच्या पुरामुळे नेपाळमधील अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
रस्ते आणि परिसर जलमय झाले असून अनेक ठिकाणी माती आणि ढिगाऱ्यामुळे बचावकार्याला अडथळे निर्माण झाले आहेत.
नैसर्गिक प्रलयात 781 जणांचा मृत्यू
अशा परिस्थितीत बँकेतील कोट्यवधींची संपत्ती सुरक्षित बाहेर काढणे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते.
दरम्यान, नेपाळमध्ये आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी बचाव, मदत आणि पुनर्वसनाचे काम सुरू असल्याची माहिती दिली आहे.
आतापर्यंत या नैसर्गिक प्रलयात 781 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. आर्थिक आणि भौतिक नुकसानीचा आढावा घेण्याचे कामही सुरू आहे.









