जळगाव : धरणगाव तालुक्यातील चावलखेडा गावातील सुरेश भील पुराच्या पाण्यात तब्बल पाच तास एका झाडावर अडकून पडले होते. त्यावेळी नागाशी देखील त्यांनी सामना केला.
पुराच्या पाण्यात पाच तास झाडावर
एका बाजूला वेगाने वाहणारे पुराचे पाणी तर दुसरीकडे झाडावर चढलेले विषारी नाग अशा दुहेरी संकटाचा सामना करत सुरेश भील यांनी प्रचंड धैर्य दाखवले. पाण्याची पातळी कमी होताच त्यांनी स्वतः नदी पार करून सुखरूप सुटका करून घेतली.
सुरेश भील नेहमीप्रमाणे नदीत मासेमारीसाठी गेले होते. अचानक धरणातून पाणी सोडल्याने पाण्याचा जोर प्रचंड वाढला आणि ते बाहेर पडू शकले नाहीत.
जीव वाचवण्यासाठी त्यांनी जवळच्या झाडाचा आधार घेतला आणि त्यावर चढून बसले.
मात्र झाडावर काही विषारी नागही आश्रयासाठी चढले होते. यामुळे भीती निर्माण झाली.
एकीकडे खाली पुराचे पाणी आणि दुसरीकडे नाग अशा बिकट परिस्थितीत त्यांनी झाडाच्या फांद्या तोडून नागांना पाण्यात फेकून दिले आणि स्वतःचा बचाव केला.
पुराचे पाणी कमी झाल्यावर पोहून जीव वाचवला
पाण्याची पातळी थोडी कमी झाल्यानंतर सुरेश भील न घाबरता पोहून सुरक्षित किनारा गाठले.
सुटका झाल्यानंतर त्यांनी स्थानिक अहिराणी भाषेत सर्व ग्रामस्थ आणि प्रशासनाचे मनापासून आभार मानले. गावकऱ्यांनी वाचवण्यासाठी प्रयत्न केले.
तसेच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून धरणातून पाणी कमी केल्याबद्दल जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांचे विशेष आभार व्यक्त केले.
चाळीसगाव तालुक्यातही ढगफुटीसदृश पाऊस
दरम्यान, जळगाव पाऊस चा कहर चाळीसगाव तालुक्यातही दिसला. ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे नारळी नदीला मोठा पूर आला.
बहाळ, कुंझर, कळमडू, पोहरा आणि खेडगाव परिसराला फटका बसला. केळीच्या फळबागा आणि उभी पिके वाहून गेली. काही ठिकाणी गुरेढोरेही वाहून गेली.
पुराच्या पाण्यात बहाळ येथे एक घर कोसळून संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले तर गटारी तुंबल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले.
पूर ओसरल्यानंतर प्रशासनाने पंचनामे सुरू केले आहेत. बाधित शेतकरी व नागरिकांनी तातडीची मदत आणि नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
अशा प्रकारे पुराच्या पाण्यात जिल्ह्याततील अनेक रस्ते बुडून गेले होते तर खड्डे जलमय झालेली होते. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली.









